(प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
ऑक्टोबर महिन्यात पालिका निवडणुका होतील असा प्राथमिक अंदाज आहे. अद्याप आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी विट्यात मात्र राजकीय हालचालीना चांगलाच रंग भरू लागला आहे. रोज नवनवीन राजकीय समीकरणे पुढे येत आहेत. खेळ्या प्रति खेळ्या, डाव प्रतिडावं याला चांगलीच रंगत भरू लागली आहे. राजकीय उड्या जेवढ्या मारता येतील तेवढ्या मारल्या जात आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील हे भाजपच्या वाटेवर असल्याची शहरात दोन दिवस चांगलीच रंगतदार चर्चा सुरू आहे. कार्यकर्त्यातून अतिशय सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. विरोधात किती काळ बसायचे सत्तेत गेल्याशिवाय गत्यन्तर नाही असा साक्षात्कार पिता पुत्रांना झाल्याची दबकी चर्चा ऐकावयास मिळत आहे. हे दोघे भाजप मध्ये गेल्यावर पालिकेसाठी ज्यांचा पाठींबा त्यांनी गृहीत धरलाय ते अशोक गायकवाड त्यांच्या पाठीशी राहणार का हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या बाजूला
आमदार गोपीचंद पडळकर यांनी खानापूर तालुक्यात घट्ट पाय रोवण्यास सुरवात केली आहे. गुळवणी परिवारातील मयुरेश गुळवणी यांचा भाजप प्रवेश हा आमदार सुहास बाबर यांना एक जबर हादरा मानला जातो. पुन्हा काही राजकीय मंडळी एका पक्षाच्या व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करत असल्याचे पहावयास मिळत आहे.
पालिकेच्या निवडणुकीत त्यामुळे आत्ता अधिक चुरस निर्माण होणार आहे. खानापूर परिसरात व विट्याच्या राजकारणात एकूणच भाजपला चांगले दिवस येणार असे मानले तर ते चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही दिवसापासून अंतर्गत कुरघोड्या मुळे गुळवणी गट नाराज असल्याचे चित्र आहे. एकमेकांना एकमेकांची ताकद दाखवण्याची हीच वेळ आहे असे समजून प्रत्येकजण कामास लागल्याचे चित्र दिसून येत आहे. साऱ्या पक्षांची आवस्था तसे पाहिले तर दयनीय आहे. प्रत्येकजण सत्तेसाठी धडपडत आहे. माजी नगरसेवक पुन्हा बाशिंग बांधून तयार आहेत. मात्र त्यातील बहुतांश जणांना डच्चू मिळेल असेच सध्याचे वातावरण आहे. चौकातील कट्टा गँग रोज एक नवीन अफ़वा पसरवण्याचे काम करत आहे. खऱ्या अर्थाने विकास काम करणारे स्वच्छ चेहरे पालिकेत यावेत अशी लोकांची अपेक्षा आहे. अजून बरेच पाणी पुलाखालून जाणार आहे. त्या प्रवाहात किती जण टिकून राहतात हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे. बाबर, गुळवणी, गायकवाड, शितोळे, पाटील, भिंगारदेवे, पडळकर, हारूगडे, या सर्वांच्या भूमिका महत्वाच्या ठरणार आहेत. समाजाचे पाठबळ हाही विषय दुर्लक्षुन चालणार नाही. आणखी दोन तीन महिने अशा अनेक चर्चा ऐकावयास मिळाल्या तर त्यात नवल वाटायला नको.