( प्रदीप जोशी, विटे पत्रकार )
खानापूर आटपाडी तालुक्यात अतिवृष्टी मुळे डाळींब, द्राक्ष, पेरू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. बागा वाचवण्यासाठी शेतकरी वर्गाची धडपड सुरु आहे. हंगाम वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मान्सून पूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. सलग बारा दिवस पाऊस पडत आहे. आगाप हंगाम धरलेल्या डाळींब बागेत मोठ्या प्रमाणावर फुलगळती झाली आहे. त्यामुळे या वर्षीचा हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हंगाम धरलेल्या डाळींब बागाना फटका बसला आहे. भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. सलग पंधरा दिवस सूर्य दर्शन न झाल्याने एप्रिल मधील बागेत पूर्ण फुलगळती झाली आहे. ठिकठिकाणी झाडे विजेचे खांब पडले आहेत.
डाळींब बागेतील झाडे पडली आहेत. लेंगरेवाडीत पेरूच्या बागेचे मोठे नुकसान झाले आहे. चाऱ्या साठी पेरणी केलेल्या ज्वारी मका पिकाचे देखील नुकसान झाले आहे. मशागतीच्या कामात अडथळा निर्माण झाल्याने खरीप हंगामातील पेरणीवर त्याचा परिणाम होणार आहे. टेंभूचे पाणी आल्याने मार्च एप्रिल मध्ये पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी बागा धरल्या. त्या फुलोऱ्याच्या अवस्थेत होत्या. फळ धारणेच्या काळातच पाऊस झाल्याने नुकसान झाले. बागेत पाणी साचले आहे. शेतकरी हतबल झाला आहे.