(प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
शहरातील चार प्रमुख रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. तासगाव नाका, खानापूर नाका, कराड नाका, मायणी नाका येथे वाहतूक सतत ठप्प असते. शहराच्या मध्यवर्ती चौकात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र सतत पहावयास मिळत असते. वाहतूक पोलीस व पालिका प्रशासन यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने हे चित्र पहावयास मिळत आहे. खर तर मुख्य चौकातच सिग्नल व्यवस्था आहे. ती कधीतरी कार्यान्वित असते. सतत बंद आवस्थेत असते. ती दुरुस्त करण्याचे एक दोन वेळा प्रयत्न झाले. त्यातून काहीही साध्य झाले नाही. त्यामुळे वाहतूक सिग्नल व्यवस्था केवळ नावालाच आहे. सर्व रस्त्याने येणाऱ्या वाहतुकीचा प्रचंड ताण जाणवत असल्याने सारी यंत्रणाच हतबल झाली आहे. मध्यंतरी याच मार्गांवर सेफ झोनचा प्रयत्न झाला. मात्र तो नावालाच ठरला. त्यातून कोणताही प्रश्न सुटला नाही. मुळात शहरात दुचाकी चारचाकी वाहनांचे वाहनतळ नगरपालिकेजवळ आहे.
रस्त्याच्या दुतर्फा दोन्ही बाजूस वाहने उभी केलेली असतात. त्यातून मार्ग काढतच पादचारी ये जा करत असतात. पांढरे पट्टे ओढलेले आहेत. मात्र ते केवळ नावालाच आहेत. वाहतूक पोलिसांना देखील एक प्रकारची कसरत करावी लागते. चौकातील दुकानांचे पार्किंग वाहतुकीला अडथळा ठरत आहे. नेवरी रस्ता, विवेकानंद नगर पिकअप शेड येथे सर्कलची योजना हवी. मायणी रस्त्याला खाध्य विक्रेते मोठ्या प्रमाणावर असल्याने वाहने कशीही पार्क केली जातात. मुळातच पोलीस व पालिका यांच्यात समन्वय असणे गरजेचे आहे. वाहतूक नियम न पाळणारांना कडक दंडात्मक कारवाई झाल्याशिवाय शहरातील वाहतुकीला शिस्त लागणार नाही. पावसाळ्यात तर खूप हाल होतात. फ्लाय ओव्हर ची योजना होती. मात्र व्यापारी वर्गाचे हीत जपण्यासाठी त्याला कडाडून विरोध केला गेला. रिंग रोडची योजना होती. त्यात राजकीय हितसंबंध आडवे आले. त्यामुळे वाहतुकीच्या सुविधा येथे फारशा झाल्याच नाहीत. वाहतूकीचा बोजवारा होण्यास सकाळी विटे दुपारी उपराटे हेच गणित कारणीभूत ठरले. चौकातील अतिक्रमणे रोखणार तरी कोण? हाही महत्वाचा प्रश्न आहे.