राजगुरुनगर, दि. ९ मे (शुक्रवार):
खेड तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शेतकऱ्यांसाठी केवळ ५० रुपयांत जेवण थाळी उपक्रमाची सुरुवात आज उत्साहात करण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन आमदार बाबाजी शेठ काळे (जुन्नर) आणि आमदार शरद सोनवणे, तसेच संत तुकाराम साखर कारखान्याच्या संचालिका ज्योतीताई केशव आरगडे व रोहिदास राक्षे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयसिंह शिंदे पाटील, उपसभापती आणि सर्व संचालक मंडळ यांनी केले होते. या उपक्रमातून शेतकरी वर्गाला पोषणमूल्य असलेले दर्जेदार जेवण अल्पदरात मिळणार असून, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी बाजार समितीने घेतलेली ही सकारात्मक पावले निश्चितच आदर्शवत आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल डावरे यांनी केले. उपस्थित शेतकरी, व्यापारी आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत बाजार समितीच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले. शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम नियमितपणे राबवले जातील, असे आमदार बाबाजी शेठ काळे यांनी सांगितले.
राजगुरुनगर आणि चाकण परिसरात या नवकल्पनांची अंमलबजावणी होत असून, शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन बाजार समिती अधिकाधिक उपयुक्त योजना राबवणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.
