( प्रदीप जोशी, विटे प्रतिनिधी )
साहित्य हा समाज मनाचा आरसा आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या चिंताजनक आहेत. शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना साहित्यात येणे गरजेचे आहे. शासनाने त्या सोडवल्या पाहिजेत. असे मत संमेलनाध्यक्ष व माजी आमदार रामहरी रुपनवर पाटील यांनी व्यक्त केले. खानापूर तालुक्यातील आळसंद येथे सातवे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते.
आळसंद येथील श्रीमंत खानाजीराव जाधव, दिशा साहित्य कला संस्कृती प्रतिष्टान यांच्या वतीने त्याचे आयोजन करण्यात आले होते. स्वागताध्यक्ष सुभाष पाटील होते.
ते म्हणाले, ” शेतकरी कामगार कष्टकरी यांचे जगणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे. त्यांच्या समस्या साहित्यात आल्या पाहिजेत. शेतीचे तंत्रज्ञान बदलत चालले आहे. त्याची माहिती साहित्यातून आली पाहिजे. खानापूर, आटपाडी, कडेगाव दुष्काळी तालुके असले तरी त्यात साहित्याचा सुकाळ आहे. नव्या पिढीने साहित्य वाचले पाहिजे. “
सर्जेराव खरात यांनी कथा सादर केली. नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. रत्न कुमार नरुले यांनी प्रास्ताविक केले. शरद माळी यांनी सूत्रसंचालन केले. रमेश कोष्टी यांनी आभार मानले.