( प्रदीप जोशी, मुक्त पत्रकार )
शहरात व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. सेवाधर्म हीच त्यामागची भूमिका असते. पुणे देखील त्याला अपवाद कसे असणार? मुळातच पुणे तेथे काय उणे असा पुण्याच्या लौकिक. मी गेले महिनाभर उड्री चौकातील अमित कलरी मध्ये वास्तव्यास आहे. येथे उन्हाळ्यात मोफत थंडगार पाणी व ताक पुरवले जाते. तसेच श्रमजीवी घटकांना रोज प्रत्येकी दोन केळी मोफत दिली जातात. अमित कॉलनीत राहणारे विनय शहा त्याचे नियोजन करतात. रोज सकाळी दोन तीन क्रेट केळी येथे येतात. घरकाम करणाऱ्या बायका, स्वच्छता काम करणारे कामगार, सुरक्षा रक्षक, लहान मुले यांना केळी पुरवली जातात. सकाळी सहा वाजल्यापासून त्याचे वाटप सुरु असते. हा उपक्रम कॉलनी पुरता मर्यादित आहे.
मोफत पाणी व ताक हा उपक्रम सर्वासाठी खुला आहे. एप्रिल, मे, जून हे तीन महिने हा उपक्रम सुरु असतो तर केळी वाटपाचा उपक्रम वर्षभर सुरु असतो. मुख्य रस्त्याच्या कडेला एक छोटा मंडप उभारला आहे. तेथे चावी असलेले चार मोठे डेरे ठेवले आहेत. त्यात सकाळी पाण्याच्या मोठ्या बॉटल मागवून पाणी भरले जाते. डेरे पाण्यानी सतत भरलेले असतात. उन्हाळ्याच्या दिवसात लोकांना गार पाण्याचा थंडावा मिळतो. पाणी पिण्यासाठी ग्लास देखील ठेवलेले आहेत.

येथील स्वच्छता वाखाणण्यासारखी आहे. तेथे दुपारी बारा ते दोन या वेळेत मोफत थंड ताक वाटप केले जाते. दह्याच्या पिशव्या आणून मोठ्या कॅन मध्ये ताक घुसळले जाते. त्याचे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मोफत वाटप केले जाते. कॉलनीतील ज्या व्यक्तीचा वाढदिवस असेल किंवा कोणाला या उपक्रमाला मदत करावी वाटली तर त्यात कोणीही सहभागी होवू शकतो. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी देखील एक दिवस केळी वाटपासाठी ठराविक रक्कम दिली होती. जी व्यक्ती सहकार्य करेल तिचे नाव मोबाईल ग्रुपवर टाकण्यात येते. हे दोन्ही उपक्रम मला खूपच भावले. एखाद्याची तहान भूक भागवणे यासारखे दुसरे कोणतेही सत्कर्म नाही. एकही दिवस न चुकता दोन्ही उपक्रमांचे सातत्य टाकवणे तसे खूपच कठीण. पण अनेकांचे हात त्यासाठी पुढे येऊन राबत असल्याने ते सहजशक्य झाले आहे. खर तर कॉलनीतील लोकांना धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच आहेत. सेवानिवृत्त लोक येथे संख्येने जास्त आहेत. आपणहून ते उपक्रमात सहभागी होतात.