( प्रदीप जोशी, पत्रकार, विटे )
राजकारणात सध्या मनोमीलन राजकारणास सुरवात झाली आहे. काका पुतण्या, दोन भाऊ, एकत्र येण्याच्या प्रक्रियेस सुरवात झाली आहे. कुठे बराच वर्षांपासूनचा भावकीचा वाद संपवला जात आहे. आजवर सत्ता संपत्ती साठी नाते संबंध विसरलेली मंडळी आज अचानक उपरती होऊन मनोमिलनाची भाषा करू लागले आहेत. त्यासाठी कोणी आषाढी एकादशी पर्यंतचा मुहूर्त शोधला आहे. त्यामुळे गाव पातळी पासून वरिष्ठ पातळी वरचे सारे संदर्भ बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पूर्वी कोण कोठे होता आज तो कोठे आहे हे तपासून घेताना सामान्यांची मात्र दमछाक होणार आहे. भाऊ बंदकीचे वैर तसे सहजा सहजी विसरण्या सारखे नसते. मात्र राजकारणात काहीही होवू शकते. आजवर एकमेका बद्दल कधीही चांगले न बोललेले अचानक एकमेकांचा गुणगौरव करू लागतात.
सत्ता संपत्ती यांचा योग जुळवून आणण्यासाठी राजकारणी मंडळींना असे वागावे लागते. लोक भाबडे असतात. त्यांना यातील बारकावे कळत नसतात. ते फक्त आवाक होऊन पहात असतात. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो किंवा कोणी कोणाचा शत्रू नसतो. सामान्य मतदाराला देखील मनोमीलन करता आले पाहिजे. मात्र तसे घडत नाही. मागच्या निवडणुकीत आमच्या भागात चांगलीच गंम्मत झाली. एका निवेदक कार्यकर्त्याने पक्ष प्रवेश केला. आपण आता नव्या पक्षात आहोत याचे त्याला भान राहिलेच नाही. नेते मंडळी व्यास पीठावर येताच त्याने जुन्याच घोषणा दिल्या. एकच हशा पिकला. कधी कधी असे घडते सुद्धा.